वाघोलीत वीज तारांमध्ये शॉर्टसर्किट   

खेळणारी लहान मुले थोडक्यात बचावली

वाघोली :  पुणे-अहमदनगर महामार्गाला जोडणार्‍या वाघोली येथील केसनंद रस्त्यावरील छत्रपती नगर परिसरात महावितरणच्या अतिशय बेजबाबदार आणि निष्काळजी कारभारामुळे स्थानिक नागरिकांच्या जिवाला घोर धोका निर्माण झाला आहे. छत्रपतीनगर कमान आणि ’ऑक्सी अल्टीमा’ सोसायटीच्या शेजारील मुख्य वीज वाहिन्यांवर दररोज भयानक शॉर्टसर्किट होत असून,  या ठिकाणी एक थरारक प्रसंग घडला. वीज वाहिन्यांमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन ठिणग्या उडू लागल्याने, तिथे जवळच खेळत असलेली लहान मुले भयभीत होऊन पटापट घराच्या दिशेने पळाली. सुदैवाने मुलांनी प्रसंगावधान राखल्याने बुधवारी एक अतिशय मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, दररोज घडणार्‍या या घटनांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
 
वायरमनची तात्पुरती मलमपट्टी नागरिक त्रस्तस्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात विजेचा दाब कमी-जास्त होणे आणि वायर्समध्ये शॉर्टसर्किट होणे ही रोजचीच बाब झाली आहे.परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा मोठा बिघाड झाल्यावर नागरिक महावितरणकडे तक्रार करतात. त्यानंतर स्थानिक वायरमन येतात, जोडण्या करून तात्पुरती दुरुस्ती करतात आणि निघून जातात. मात्र, वीज प्रवाह पूर्ववत होताच अवघ्या काही तासांत पुन्हा तोच प्रकार सुरू होतो. महावितरणचे अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसून, ते एखाद्या मोठ्या रक्ताच्या अनर्थाची किंवा जीवितहानीची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.भावी आमदार, लोकप्रतिनिधी फक्त बॅनरवरच आहेत. सामान्य नागरिक वार्‍यावर सोडल्याचे दिसत आहे. एकीकडे नागरिक रोज मृत्यूच्या छायेत जगत असताना, दुसरीकडे मात्र राजकीय अनास्था उघड झाली आहे. 

Related Articles