व्हॉट्सऍप कट्टा   

सोनेरी शिक्षा      
 
मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते. मधली सुट्टी देते तो आनंदविसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता.       
 
स्टाफरूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या. चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या चर्चाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगतीपुस्तके काढून घ्यायला उठले होते. एवढ्यात पाचवीतली एक मुलगी रडत रडत आत आली. बोकील बाई कुठेत? असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा अ‍ॅल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या  पायरीवर बसले, तिला शेजारी बसवलं. तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायचा प्रयत्न करत होते. पाचवीतली ही मुलगी माझ्याकडे का आलीय ते मला कळत नव्हतं कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते.हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्यापुढे धरला. तो डबा सगळीकडून चेपला होता. कारण विचारल्यावर मला कळले की ती पटांगणाच्या कडेच्या कट्ट्यावर डबा खायला बसली होती आणि खाऊन झाल्यावर खेळायच्या नादात डबा तिथेच विसरली. नंतर आणायला गेली तेव्हा काही मुले तिच्या डब्याचा फुटबॉल करून खेळत होती. तिच्या डब्याची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली होती ती माझ्या वर्गातील, दहावीतील मुले होती. म्हणून ती तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती.     
 
हे सांगतानाच तिने तो डबा माझ्या हातात दिला आणि त्याची अवस्था बघून मी खरोखर शहारले. आता माझी आई मला मारेल बाई, मी आईला काय सांगू? असं म्हणून ती परत स्फुंदू लागली. मी तो डबा माझ्याकडे घेतला. तिला म्हटले, आईला सांग की डबा बोकील बाईंकडे आहे आणि जमले तर उद्या संध्याकाळी मला भेटायला या. मग मी त्यांना सगळं सांगेन.      
 
प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली पाहून पोरीचं टेन्शन सरबतातल्या बर्फासारखं विरघळून गेलं आणि ती डोळे पुसून उड्या मारत जिना चढून तिच्या वर्गात गेली.    
  
माझ्या वर्गावर माझा शेवटचा तास होता. वर्गात जाऊन तो डबा मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसले. नेहमीप्रमाणे सामूहिक कविता म्हणून झाल्या. आज बाई खुर्चीत कशा बसल्यात याचं आश्चर्य सगळ्या चेह-यांवर दिसत होतं. टेबलवर ठेवलेला डबा पाहून काही मुलं चपापून खाली माना घालून बसलेली माझ्या नजरेला दिसत होती.      
 
कविता संपल्यावर मी डब्याकडे बोट दाखवून म्हटलं, हा पराक्रम ज्यांनी केला आहे त्यांनी शाळा सुटल्यावर मला स्टाफ रूमच्या बाहेर भेटायचं आहे. मला खात्री आहे की यात सामील असलेले सगळे जण तिथे येतील.      
 
मुलांच्या हातून घडतात त्या बव्हंशी चुका असतात, गुन्हे नाहीत हा माझा विश्वास होता. योग्य पद्धतीने हाताळले तर चुका सुधारू शकतात हा माझा अनुभव होता आणि अजूनही आहे. कधी कधी चुका अनवधानानेही होतात. मुलांना त्यांची बाजू आधी मांडू द्यायला हवी. मग काय तो न्यायनिवाडा! आवाज चढवून डाफरण्यावजी, आपण कुठे चुकलो हे मुलांना आतून स्वत:ला कळायला, पटायला, मान्य व्हायला हवं. ते झालं की मग सुधारणेचा मार्ग आपोआप पायाखाली येतो ही माझी श्रद्धा आहे. मुलांच्या चुकीचा पंचनामा भर वर्गात करण्यासारखी घोडचूक नाही आणि मूठभर मुलांना झापण्यात वर्गाचा वेळ वाया घालवण्यासारखा मूर्खपणा नाही असं माझं दृढ मत आहे. त्यानुसारच सारं काही झालं.      
 
शाळा सुटली. स्टाफरूम ब-यापैकी रिकामी झाली मग मी बाहेर उभ्या असलेल्या पाच जणांना आत बोलावलं, डबा दाखवला आणि हे तुम्हीच केलंत का विचारलं. ते कबूल झाले; पण त्यांचं म्हणणं होतं की डबा तिथे खाली पडला होता. मी म्हटलं, तुम्ही तो उचलून ऑफिसमध्ये का ठेवला नाहीत? या गोष्टीने मला फार दु:ख झालं की माझ्या वर्गातल्या मुलांनी असं वाईट कृत्य करावं. तुम्ही डब्याला नव्हे, एका गरीब माणसाच्या कष्टांना लाथ मारलीत. हा डबा खरेदी करायला जी रक्कम लागली असेल ती त्याने घाम गाळून मिळवली असेल त्या मेहनतीचा तुम्ही अपमान केलात. अरे, एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी नमस्कार करायची आपली पद्धत! आणि इथे अन्नाला लाथा मारल्यात तुम्ही?      
 
मला भीती या गोष्टीची वाटते की आज एका निर्जीव गोष्टीचा असा छळ करणारे तुम्ही उद्या कॉलेजमध्ये एखाद्या सजीव व्यक्तीचाही गंमत म्हणून असा छळ करायला मागेपुढे बघणार नाहीत. तुम्ही रॅगिंग करणारे बनाल याचीच तर ही लक्षणे नाहीत? इतका दुष्टपणा आला कुठून? वर्षभर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असं दुष्कृत्य करत असतील तर तुमच्यावजी शिक्षा मीच घ्यायला हवी.      
 
माझं शेवटचं वाक्य ऐकल्यावर मुले हलली. सगळ्यांच्याच तोंडून ’’सॉरी बाई, तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा करा पण असं नका म्हणू! असे पश्चात्तापाचे अस्सल उद्गार निघू लागले. मी म्हटलं, तुम्हाला शिक्षा करून त्या बिचारीचा डबा परत मिळणार आहे का? मुलं क्षणभर गप्प बसली मग एकजण म्हणाला, आम्ही भरून देऊ तिचा डबा. कसा? पालकांकडून पैसे घेऊन? मग तुमच्या चुकीची शिक्षा पालकांना झाली. नाही बाई आम्ही काम करू आणि तेवढे पसे मिळवू. मी म्हटलं, ठीक आहे, पण तुम्ही या सगळ्याची कल्पना आधी पालकांना दिली पाहिजे. त्यांची परवानगी घेऊनच पुढे काय ते करायचं. मान्य आहे.? सगळ्यांनी माना डोलावल्या. आणि एक, आठवडाभर माझ्याशी बोलायचं नाही. त्यांचे चेहरे पार उतरले. ही शिक्षा कदाचित त्यांना मोठी वाटली असावी. 
तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारी सकाळी त्या मुलीची आई मला भेटायला आली. सोमवारी मुलांनी त्या मुलीला तिच्या डब्यापेक्षा चांगला डबा छान रंगीत पेपरमध्ये गुंडाळून दिला होता. त्यासाठी पैसे कुठून आणलेत असे ती त्यांना आज विचारायला आली होती.मी तिला सांगितले की त्यांच्यापैकी एकाच्या काकांचे जवळच लहानसे घर होते. घराभोवती वाढलेले गवत काढून बाग स्वच्छ करायचे काम माळ्यावजी मुलांनी रविवारी केले होते. मुले 15-16 वर्षांची होती त्यामुळे काही अडचण नव्हती. अ‍ॅल्युमिनियमचा डबा काही फारसा महाग नव्हता. तेवढे पैसे सहज मिळवता आले होते त्यांना तास- दोन तास काम केल्यावर. मी वर्गात गेले तर टेबलवर रंगीत कागदात गुंडाळून एक पेन ठेवले होते. हे काय आहे विचारल्यावर एकाने उभे राहून सांगितले की- डबा घेऊन झाल्यावर पैसे उरले. मग त्यातून आम्ही तुमच्यासाठी हे पेन आणले.      
 
माझ्यासाठी? कशाला? माझा काय संबंध? मला नको बाबा हे. मी असं झटकून टाकताच पाचांचे चेहरे गोरेमोरे झाले. एकजण उठून हळूच म्हणाला, मॅम तुम्ही या पेनने रोज प्रेजेंटी मांडा. तुमच्या हातात हे पेन बघून आम्हाला आमच्या चुकीची रोज आठवण येईल आणि परत अशी चूक आमच्या हातून होणार नाही.       
मग जरासा धीर चेपला पांडवांचा आणि दुसरा म्हणाला, बाई, आता तरी तुम्ही आमच्याशी बोलणार ना?
 
ते प्रामाणिक, भाबडे शब्द ऐकून मला भरून आले. माझा कठोरपणा विरघळला आहे हे लक्षात आल्यावर मग बाई, उघडा ना पेन. असा आग्रह सुरू झाला. सोनेरी रंगाच्या त्या पेनने त्यानंतर मी रोज हजेरी मांडली. तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी सोनेरी होऊन गेला.             
                     
- संजीवनी बोकील.
 
रिते झाले मन माझे
 
रिते झाले मन माझे..
रित्या सार्‍या आठवणी...
रित्या मनाच्या कोंदणी..
 
नव्या नवलाईची आस मनी...
नव्याने मग फिरूनी येती...
 
त्याच आठवणींच्या फैरी...
होत नसे असे कधी...
आठवणी सार्‍या विरुनी जाती...
 
साद तो रित्या मनाचा...
ठाव घेई गत आठवणींचा...
गुरफटी मन माझे...
कोंदणी अस्तित्व त्याचे...
 
- प्राजक्ता पारसनीस
मो. : 7875554516
-------------------
प्रेम पाहिजे तर समर्पण खर्च करावा लागेल,
विश्वास पाहिजे तर निष्ठा खर्च करावी लागेल,
सोबत हवी तर वेळ खर्च करावा लागेल,
कोण म्हणतं नाती फुकट मिळतात?
एक श्वासदेखील तेव्हाच घेतला जातो...
जेव्हा एक श्वास सोडला जातो..
------------------
रात्रीचे अडीच वाजलेले असतात
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.....
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो
नवरा : काय झालं? काय झालं....?
बायको : काही नाही तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात आधी गोळी घ्या, मग झोपा.

 

Related Articles