मंत्रालय, ठाणे, नाशिक ‘हनी ट्रॅप’चे केंद्र   

नाना पटोले यांनी विधानसभेत दाखवला पेनड्राईव्ह

मुंबई, (प्रतिनिधी) : मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे ‘हनी ट्रॅप’चे केंद्र बनले आहे. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे जेष्ठ आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत  औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी ‘हनी ट्रॅप’चे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला.
 
या हनी ट्रॅपमुळे  महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात असून राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधे निवेदन द्यायला सुद्धा तयार नाही हे अत्यंत धक्कादायक असल्याचे पटोले म्हणाले. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता अत्यंत चिंताजनक आहे. ‘हनी ट्रॅप’सारख्या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव यामुळे  राज्यात नेमके  काय चालले आहे? असा प्रश्न निर्माण होतो. राज्याच्या सुरक्षेचे प्रश्न असोत किंवा गरिबांचे  जीवनमान सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असेही पटोले म्हणाले. या आधी, मी रेशनिंग व्यवस्थेतील भेसळीचा मुद्दा उपस्थित केला होता. गोरगरीब जनतेला दिला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा आहे. याशिवाय, रेशनिंग दुकानांवर बसवण्यात आलेली मशीनसुद्धा बोगस असल्याचे दिसून आले आहे. 

Related Articles