स्मरण तेजाचे : संकलन : शैलेंद्र रिसबूड
काँग्रेस अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला लोकमान्य टिळकांनी दै. ’केसरी’मध्ये होमरुल लीगसंबंधी चार लेखांची लेखमाला लिहिली. या लेखांमधून त्यांनी होमरूल लीगची कल्पना तपशिलात स्पष्ट करून सांगितली.
पहिल्या लेखात ते म्हणतात – ‘भारत व इंग्लंड यांच्यातील नाते निष्ठावान सेवक व त्याचा मालक यांच्यातील नात्यासारखे राहिले होते; हे नाते आता दोन निष्ठावान मित्रांसारखे व्हावे’ असे टिळक म्हणतात. सरकार युद्धात गुंतलेले असताना या मुद्द्यांवर चर्चा करणे योग्य नाही. या आक्षेपांवर उत्तर देताना टिळक म्हणतात, की त्यांनी सर्व मागण्या एकाच वेळी केलेल्या नाहीत. सरकारला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायची आपली तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले; पण राजनिष्ठा राखत असतानाच आपल्याला स्वराज्याचीही तितकीच तीव्र इच्छा आहे, असे टिळकांनी स्पष्टपणे सांगितले. आपली मागणी काही भेट मिळावी किंवा दान मिळावे यासाठीची नाही; देशाच्या प्रशासनात म्हणजेच राज्यव्यवस्थेमध्ये आपला सहभाग असणे, हा लोकांचा नैसर्गिक हक्क आहे, असे टिळकांचे प्रतिपादन होते.
दुसर्या लेखात लोकमान्य टिळकांनी देशाच्या अंतर्गत प्रशासनाला विशिष्ट बाबींमध्ये पूर्ण स्वायत्ता असावी, अशी मांडणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकनिर्वाचित प्रतिनिधींइतक्याच संख्यने सरकारनियुक्त सदस्य असतात. यामुळे स्वायत्ततेचे खरे तत्व डागाळते. सरकारी अधिकार्यांची सत्ता मर्यादित असायला हवी आणि कोणत्याही प्रांताची संपूर्ण राज्यव्यवस्था (प्रशासन) लोकनिर्वाचित प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार चालवायला हवी. सेक्रेटरी ऑफ स्टेट व त्यांच्या कौंसिलच्या बाबतीत असे म्हणता येईल की, भारतीय लोकांच्या सल्ल्यानुसार भारताला स्वायत्ता बहाल केल्यावर ही कौंसिल बरखास्त करावी आणि परराष्ट्रीय कामकाज केवळ सेक्रेटरी ऑफ स्टेटने सांभाळावे असे टिळक लिहितात.
बाप्टिस्ट यांच्या आठवणीप्रमाणे त्यांची व टिळकांची 1899 मध्ये गाठ पडल्यावेळी त्यांनी होमरुलचा विषय टिळकांच्या कानी घातला होता. नंतर महायुद्धाच्या काळात त्या विषयाला परिस्थिती अनुकूल असल्याबद्दल टिळकांचा विश्वास वाढला आणि ज्यांनी पंधरा-सोळा वर्षांपूर्वी होमरूलचे साध्य सुचवले त्या बाप्टिस्टा यांनाच पुण्याच्या परिषदेचे (1915) अध्यक्षस्थान देऊन टिळकांनी त्यांच्या पुढाकाराने होमरूलचे निशाण उभारले.