औरंगाबाद : शिवसेनेतील आमदार आणि खासदारांच्या बंडाळीनंतर आता पक्षांतर्गत वादही उफाळून येत आहेत. पक्षाच्या नियुक्त्यांवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच वाद होताना दिसत आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात एका नियुक्तीवरून थेट उद्धव ठाकरेंसमोरच जुंपली. त्यामुळे उद्धव ठाकरेही संतापले आणि त्यांनी या दोन्ही नेत्यांना सुनावले. तुम्ही आतल्या खोलीत बसा आणि तोडगा काढून माझ्यासमोर या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर या दानवे आणि खैरे यांनी आपल्यातील वाद मिटला.
उद्धव ठाकरे यांच्यासमोर मातोश्रीवरच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद झाला. किशनचंद तनवाणी यांना जिल्हाप्रमुखपद देण्यावरून हा वाद होता. या नियुक्तीवरून दानवे आणि खैरे आमनेसामने आले. दोघांची उद्धव ठाकरेंसमोरच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे उद्धव ठाकरेही संतापले. चर्चेनंतर तनवाणी यांना जिल्हाप्रमुख पद देण्याऐवजी महानगरप्रमुखपद देण्याचे ठरले.