आसाम जिहादी कारवायांचे केंद्र होत असल्याची भीती
गुवाहाटी : आसाम राज्य जिहादी कारवायांचे केंद्र बनले आहे. गेल्या काही महिन्यांत बांगलादेशातील अन्सारूल इस्लाम या दहशतवादी संघटनांच्या पाच कारवाया उघडकीस आल्या आहेत, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितले.
अन्सारूल इस्लाम या संघटनेशी संबंध असणारे सहा बांगलादेशी नागरिक आसाममध्ये आले असून त्यांनी तरुणांना जिहादी शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या सहा जणांपैकी एकाला नुकतीच अटक केली असून त्यांचे पहिले दहशतवादी कृत्य उघडकीस आले.
परराज्यातील इमामांकडून खासगी मदरशांमध्ये मुस्लीम तरुणांना भडकविले जात असून हे खूपच चिंताजनक आहे. या खासगी मदरशांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. दहशतवादी किंवा अतिरेकी कारवायांपेक्षा जिहादी कारवाया फार वेगळ्या आहेत. सुरुवातीला इस्लामिक कट्टरतावादाला चालना देण्यासाठी सक्रिय सहभाग आणि अखेरीस विध्वंस कारवायांमध्ये सहभाग अशा प्रकारे जिहादी कारवाया केल्या जातात, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आसाममध्ये २०१६-१७ मध्ये बेकायदा प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांनी करोना महासाथीच्या काळात विविध ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे सुरू केली होती, अशी माहितीही हिंमत बिस्वा यांनी दिली.