रामदास कदम यांची खंत
मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेची आज जी वाताहात झाली आहे त्याला पवार काका-पुतणेच जबाबदार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी उठाव केला नसता, तर पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 10 आमदारही निवडून आले नसते, असा दावा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना चांडाळ चौकडीने घेरले असल्याची घणाघाती टीका मंगळवारी केली. काका…काका म्हणत माझेच खाते घेतले, खंतदेखील आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत व्यक्त केली.
माजी मंत्री व विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर एकनाथ शिंदे गटाने त्यांची पुन्हा नेतेपदी नियुक्ती केली आहे. या कारवाईनंतर विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये कदम यांनी शिवसेना नेतृत्वावर जळजळीत टीका केली.