भाजपची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक भागांत सध्या अतिवृष्टी सुरू असल्याने नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेऊन केली. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, अशी भाजपची भूमिका असून निवडणुका पुढे ढकलल्यास हे आरक्षण पुन्हा लागू करण्यास सवड मिळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले.
राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, अशी सर्वच राजकीय पक्षांची मागणी असली तरी या कारणासाठी निवडणूक पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच, 20 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. हा सर्व पावसाचा कालावधी आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदान करायला लावणे अवघड होणार आहे. त्यामुळे आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी विनंती आम्ही केली. निवडणूक आयुक्तांनी याबाबत शहरानुसार फेर आढावा घेण्याचे आश्वासन दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताना पावसाचा अंदाज घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. आयोगाने पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असला तरी वस्तुस्थितीचा विचार करावा, असे आमचे म्हणणे आहे. 2019 व 2021 अशी दोन वर्षे कराड शहराचा बहुतांश भाग काही आठवडे पाण्याखाली होता. गेल्या वर्षी कागल शहराचा पंधरा दिवस पावसामुळे परिसराशी संपर्क तुटला होता.