विश्रांतवाडी : मला शिवसेना पुरस्कृत राज्यसभेची उमेदवारी दिली असती, तर आज शिवसेनेवर ही वेळ आली नसती, अशी टीका स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
छत्रपती संभाजीराजे हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या स्वागतासाठी विश्रांतवाडी येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राजेंद्र कोंढरे, छावा संघटनेचे धनंजय जाधव, गणेश सोनवणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संभाजीराजे म्हणाले, मला राज्यसभेला शिवसेना पुरस्कृत उमेदवारी दिली असती, तर सर्व पक्षांनी मला पाठिंबा दिला असता आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली असती.
वारीचा प्रसार देशासह, परदेशात व्हावा राज्यात संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारी पंढरपूरला जाण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील वारकर्यांना त्या काळात संरक्षण दिले होते. शिस्तबद्ध वारी परंपरेचा प्रसार हा देशासह देशाबाहेर केला गेला पाहिजे, असे युवराज संभाजीराजे यांनी मत व्यक्त केले.