काँग्रेसचे जयराम रमेश पुन्हा राज्यसभेत
बंगळुरु : राज्यसभेच्या ५७ जागांसाठीची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्यसभेच्या ५७ जागांपैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली. महाराष्ट्र, राजस्तान, हरियाणा आणि कर्नाटकमधील १६ जागांसाठी निवडणूक पार पडतेय. महाराष्ट्रातील मतमोजणी अद्याप सुरु झाली नसली तरी राज्यस्थान आणि कर्नाटकमधील मतमोजणी पार पडली आहे. कर्नाटकमध्ये भाजपनं तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे. जेडीएसच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, जग्गेश आणि लेहर सिंघ सिरोया यांचा विजय झाला आहे. तर, काँग्रेसचे जयराम रमेश विजयी झाले आहेत.
कर्नाटकमध्ये भाजपचे १२१ आमदार असून देखील त्यांनी तीन जागांवर उमेदवार दिले होते. काँग्रेसने ७० आमदार असताना २ उमेदवार दिले होते. तर, जनता दल संयुक्तने ३२ आमदार असताना १ उमेदवार दिला होता. मात्र, भाजपनं तीन जागांवर विजय मिळवले आहेत तर, काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे.
जयराम रमेश यांनी हा माझा विजय नसून टीम काँग्रेसचा विजय असल्याचे म्हटले. संपूर्ण काँग्रेस पार्टी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिध्दारामय्या आणि पक्षांच्या प्रतोद आणि सर्व आमदारांचा हा विजय असल्याचं जयराम रमेश म्हणाले. आमचे एक मत देखील अवैध ठरले नाही. हा सांघिक कृतीचा विजय आहे, असे जयराम रमेश म्हणाले.
मन्सूर अली खान यांचा देखील यामध्ये मोठं योगदान असल्याचे जयराम रमेश म्हणाले. त्यांनी भाजप आणि जेडीएसमधील लिंक समोर आणल्याचे रमेश यांनी म्हटले. जेडीएस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप रमेश यांनी केला.’तुम्ही म्हणाल तोच नियम काय?’ रवी राणांच्या मतदानावर आक्षेप, नवनीत राणा मुख्यमंत्र्यांवर भडकल्या.