मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकी पत्राच्या पार्श्वभूमीवर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीची पत्रे आली होती. या संबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती.राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी कालच गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. राज्य सरकारने आज अखेर राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कसा असेल राज ठाकरेंचा सुरक्षा ताफा?
- राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच Y+ असणार आहे.
- मात्र त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे.
- सुरक्षा ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.
राज ठाकरेंना धमकी, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये चर्चा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल (शुक्रवारी) संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. या आधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत नांदगावकर आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर काल वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली.